<p>Majha Gaon Majha Jilha : माझा गाव माझा जिल्हा : 27 ऑगस्ट 2024 : ABP Majha </p> <p>सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील <a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-navy-was-responsible-for-the-shivaji-maharaj-statue-of-sindhudurg-minister-ravindra-chavan-showed-the-letter-and-a-case-will-be-filed-against-the-contractors-1308604">राजकोट किल्ल्यावर</a> नौदलाच्यावतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. आज तो पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या घटनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. </p> <h3>राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी</h3> <p>मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?<br />मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ? </p> <p>आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे. </p> <p>मध्यरात्र उलटल्यावर<br />शहरातील पाच पुतळे<br />एका चौथऱ्यावर बसले<br />आणि टिपं गाळू लागले .<br />ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.<br />शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा.<br />आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.<br />टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.<br />गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,<br />तरी तुम्ही भाग्यवान.<br />एकेक जातजमात तरी<br />तुमच्या पाठीशी आहे.<br />माझ्या पाठीशी मात्र<br />फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !</p> <p>पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. </p> <p>पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. <br />ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.</p> <div class="twitter-tweet twitter-tweet-rendered"> </div> <blockquote class="twitter-tweet" data-loaded="true" data-twitter-extracted-i1724723026800630536="true"> <p dir="ltr" lang="mr">मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. <a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/UemC639" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ाच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?<br />मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे,…</p> </blockquote> <p>दरम्यान,मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. या संपूर्ण प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. तसंच नौदलाचे अधिकारी देखील या ठिकाणी पाहणी करणार आहेत. पुतळा पुन्हा उभारावा यासाठी मी जातीने लक्ष घालणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली. </p> <p>राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि <a title="सिंधुदुर्ग" href="https://ift.tt/cWAdw0D" data-type="interlinkingkeywords">सिंधुदुर्ग</a> जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत मालवण पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार केली. त्यानंतर ते बोलत होते.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-gaon-majha-jilha-mahararshtra-news-update-27-august-2024-abp-majha-marathi-1308633
0 Comments